Monday, July 18, 2011

आंदोलनाचे व्याकरण

       माझा १५ वर्षाचा विद्यार्थी चळवळी चा अनुभव आहे.त्यावरुन माझे असे मत आहे कि कुठलेही आंदोलन हे फक्त भावनीक असुन चालत नाही.हे एक प्रकारचे युध्दच असते.(अहींसात्मक)असले तरी.त्यामुळे आंदोलनाला त्याच्या नीर्णया पर्यंत पोहोचण्यासाठी त्याच सर्व गोष्टींची गरज असते ज्या एक युध्द जींकण्यासाठी  आवश्यक असतात.अपवाद प्राणघातक शस्त्रांचा.उदा.
         आपल्या आंदोलनाचा आवाका : आपण लढतो आहोत ते युध्द आहे की लढाई याचे भान नेत्याला असावे लागते.एका युध्दात अनेक लढाया असु शकतात.युध्द निर्णायक असते.लढाईत मात्र आपली सर्व ताकत एकाचवेळी संपवुन चालत नाही.लढाईत संपुर्ण विजय् होइलच असे नाही.पण त्यामुळे  प्रतिपक्षाचे किती नुकसान झाले.त्याचा आत्मविश्वास किती ढळला.याला महत्व असते.
      आंदोलनाचे उद्दिष्ट प्रासंगिक आहे की दिर्घकालिक या नुसार त्याची योजना करावी लागते. Trade union ची आंदोलने बहुदा प्रासंगीक असतात. उदा.पगारवाढीसाठी,फि माफीसाठी,सरकारच्या अथवा व्यवस्थापनाच्या एखाद्या निर्णया विरुध्द आदी.
      अशा आंदोलनामधे शक्तिप्रदर्शन,नाट्यमय क्लुप्त्या,प्रसारमाध्यमांचा परीणाम कारक वापर,प्रतिपक्षावरचा नैतिक,सामाजिक,राजकिय दबाव महत्वपुर्ण कामगिरी बजावतात.अशी आंदोलने संघटनेला वारंवार करावी लागत असल्याने एकाच ठिकाणी आपली पुर्ण क्षमता लावता येत नाहि.या आंदोलनांचा कालावधी सुद्धा कमी असतो.त्यामुळे अशा आंदोलनात संघटनेच्या ताकदीपेक्षा नेत्याची कल्पकता,त्याची  समुहाला हाताळण्याची क्षमता,अचानक उदभवलेल्या परिस्थीतीनुरुप त्वरित व योग्य निर्णय घेण्याची क्षमता याला जास्त महत्व असते.
     दिर्घकालीक आंदोलने ही अधीक व्यापक उद्दिष्टांसाठी व मुलभुत सामाजिक,राजकीय बदलांसाठी असतात.ही आंदोलने कुणा एका व्यक्तिच्या अथवा संस्थेच्या विरोधात नसतात.एकुणच व्यवस्था आणि सामाजीक  रुढी यांच्या विरुध्द असतात.उदा. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन,पर्यावरण बचाव आंदोलने ,गंगा स्वच्छता मोहिम आदी.सहाजिकच अशा चळवळींची कालमर्यादा आखता येत नाही.काहिवेळा तर काहि पिढया हे युध्द चालते.
    इथे नेत्याच्या व्यक्तीगत क्षमतेपेक्षा,संघटन कौशल्य, वैचारीक बैठक,सातत्य आदी मुद्दे महत्वाचे ठरतात.
संघटना बांधावी लागते,वर्धिष्णु व एकसंध ठेवावी लागते.मुळ उद्दीष्टाकडे जाणारे अल्पमुदतीचे  आणि साध्य करता येण्या जोगे टप्पे ठरवुन त्यानुसार कार्यक्रम देउन समाज आणि कार्यकर्त्यांमधे चैतन्य प्रवाहीत ठेवावे लागते.सतत नवे नेते तयार करण्या साठी प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागते. अथवा समोर दिसणारा विरोधी नसल्यामुळे आंदोलना शिथिलता येते व दीशा भरकटण्याचीही संभावना वाढते.
 शेवटी या शास्त्राचे भारतीय उद्गाते म्हणुन महात्मा गांधीचा उल्लेख करावाच लागेल.मुठभर शुर लढवय्ये क्रांतिकारक आणी मोजके लोकमान्य टिळकांसारखे समाज धुरिण यांच्यापुरता मर्यादीत असलेला स्वातंत्र्यलढा गांधीजीनी सुतकताई,प्रभातफेरयांसारखे साधे सोपे कार्यक्रम देउन आम भारतियां पर्यंत नेला.प्रत्येकाला देशासाठी लढण्याची संधी दिली आणि साध्या समुद्राकाठच्या शुल्लक मिठ उचलण्याला एका महासत्तेला दिलेल्या आव्हानात परिवर्तित केले.
आजकालच्या मिडिया प्रायोजित आंदोलनामागे असे सत्याचे (ईश्वराचे) अधीष्ठान आहे का?याचा विचार व्हायला हवा.कारण या मराठी मातीतील एका महान चळवळ्याने ४०० वर्षापुर्वीच सांगुन ठेवले आहे.
          सामर्थ्य आहे चळवळीचे।जो जो करिल तयाचे॥
परंतु तेथे ईश्वराचे।अधिष्ठान पाहीजे।
















   

शि़क्षणाच्या आयचा घो......

काल मुलाच्या शाळेत पालक शिक्षक संघाची बैठक होती.पहिलीच बैठक असल्याने उपस्थिती चांगली होती.सुरवातीचे विषय(शिक्षक विद्यार्थ्यांच्या तक्रारी) झाल्यानंतर चर्चा सरकारने जाहीर केलेल्या नविन शिक्षण पध्दतीवर घसरली.
          १ली व २ रीच्या मुलांच्या लेखी परीक्षा होणार नाहीत असे मुख्याध्यापकांनी सांगीतल्यावर सभेत एकच गोंधळ उडाला.अनेक पालकांना आपल्या मुलाचे भवितव्य अंधारात गेल्याचा साक्षात्कार झाला.परिक्षेतील गुण हेच मुलाच्या विकासाचे मुल्यमापन करण्याचे ऐकमेव परिमाण असल्याने आता आमच्या पाल्याची प्रगती कशीहोणार असा काहिसा सुर बैठकीत होता.केंद्रसरकारने तसा कायदाच केल्याने आम्हाला त्याचे पालन करणे भाग असल्याचे शिक्षकांचे म्हणणे होते.त्यांना आलेल्या सरकारी परिपत्रकात याहुन अधीक खुलासा नसल्याने ते बिचारे बचावात्मक पवित्र्यात होते.काही पालक अजुन् आपल्या पाल्याला शाळेतील बाई घरचा अभ्यासात पाढे व शुध्दलेखन का देत नाहीत या चिंतेत दिसले.
 एकंदरीत पहाता आपल्याकडे शिक्षणाचा प्रसार व्यापक स्तरावर होवुन सुद्धा बाल शिक्षणाविषयी सुशिक्षित पालकांमधेही  जुनाट विचार आढळतो.घोकंपट्टी आणि छडी लागे  छमछम वरील आपला विश्वास अजुनही दांडगा आहे.शारिरीक शिक्षेला पर्याय गुरुजींना अजूनही सापडलेला नाही.हसत खेळत शिक्षण अजूनही स्वप्नवतच आहे.मुलांच्या पाठीवरली आणि डोक्यातली ओझी कमी होत नाहीत.(या देशात बालमजुरी हा दखलपात्र गुन्हा आहे.)
          या पार्श्वभुमीवर आपले शासन नविन शिक्षण संकल्पना रुजवण्यासाठी काय करतय? तर एक सरकारी परिपत्रक काढुन संपुर्ण देशात शैक्षणिक बदलाची अपेक्षा धरतय.ना शिक्षकांचे प्रशिक्षण,ना पालकांचे प्रबोधन.जो तो आपल्या वकुबाप्रमाणे या धोरणाचा अर्थ लावत आहे.
नवी मुल्यांकन पध्दत
मुल्यांकनाचे हे पहिले वर्ष आहे.या आधी वर्षाला चार परिक्षा व्हायच्या.त्यातुन मुलांची शैक्षणिक प्रगती समजायची.नव्या पध्दतीत  लेखी परिक्षांना रजा देण्यात आली आहे.त्या ऐवजी संबधीत विषयात आणि एकुणच विद्यार्थ्याची शैक्षणिक क्षमता कशी आणि किती आहे? याचे मुल्यांकन होणार आहे.त्या आधारे विद्यार्थ्याला श्रेणी देण्यात येईल.ही पध्दत बरीचशी कटकटीची व मुख्यत्वे शिक्षकांचे काम आणि त्रास वाढवणारी आहे.या साठी सरकार त्याना आपल्या वेठबिगारीतुन वेळ देणार आहे का?पालकही ह्या प्रक्रियेतील
महत्वाचा घटक आहे. 
जुन्या पध्दतीमधे विद्यार्थी परिक्षार्थी झाला होता.नव्या पध्दतीत त्याच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा आहे.पण काही धोक्यांचा ही विचार व्हावासा वाटतो.
  1. शिक्षकांवर असणारया जनगणना,निवडणुका,पोलिओ डोस आदी. बिगर शैक्षणिक जबाबदारया या मधुन प्रत्येक विद्यार्थ्याचे योग्य मुल्यमापनासाठी वेळ मीळणार का?
  2. परिक्षांचा सराव नसल्याने ९वीआणि १० वी अधीक कठीण वाटु लागेल.
  3. विद्यार्थ्याना स्पर्धात्मक ताणाची सवय् रहाणार नाही.
  4. अशिक्षित पालकाना श्रेणी पध्दती न कळल्यामुळे गोंधळ ऊडेल.
  5. नापास होणार नाही म्हणुन विद्यार्थी निवांत रहातील.
शेवटी योजना किंवा धोरणे कागदावर् कितीही आश्वासक वाटली तरी त्यांची यशस्विता ही लोकसहभागावर आणि त्या कार्यवाहीत् आणणारया कर्मचारयांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.आणि या दोन् गोष्टी प्रबोधन व प्रशिक्षणाशिवाय साध्य होत नाहित.हे आपल्या शासनाला कळेल तो सुदिन.............